Monday, 14 November 2016

औद्योगिक जागेचे वास्तुशास्त्र



वास्तुशास्त्र हे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचतत्वावर आधारित असुन त्याचे नियम हे कालातीत आहेत. मात्र त्या नियमांचा अर्थ आणि वापर हा वास्तूसापेक्ष आहे. त्यामुळे एखाद्या वास्तूचा अभ्यास करत असताना सर्व नियम जसेच्या तसे न वापरता त्या वास्तूचा वापर काय आहे, हे जाणुन घेणे महत्वाचे ठरते. औद्योगिक उत्पादनांच्या वास्तूंबद्दल बोलायचे झाले तर उत्पादनासाठी लागणारी आवश्यक यंत्र, त्यांचा वापर, कच्चा माल-पक्का माल (उत्पादित/विक्रीयोग्य माल), उत्पादित वस्तुंचे आकारमान, यासारख्या अनेक मुद्द्यांचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतरच तिथे वास्तुशास्त्राचे नियम लावता येतात.



कच्च्या मालाचे प्रमाण वाढत आहे, याचाच अर्थ उत्पादन वाढत आहे. आणि म्हणुन तो नैऋत्य दिशेस ठेवावयास हवा तर तयार माल जेवढ्या लवकर विक्रीस जाईल तेवढ्या लवकर नव्या उत्पादनासाठी भांडवल उभे राहील. आणि म्हणुन तो वायव्य दिशेला ठेवावयास हवा. वस्तुमानाचा विचार करता सर्वाधिक वस्तुमान हे नैऋत्य भागात तर सर्वात कमी ईशान्य भागात असावे. आग्नेय व वायव्य भागात मध्यम वस्तुमान असावे. ब्रह्मस्थान मोकळे सोडता आले तर अधिक उत्तम अथवा तेथील वस्तुमान एकंदर वस्तुमानाच्या प्रमाणात कमी राहील किमान याची काळजी घ्यावी. ऊर्जेचा विचार करता अग्नीशी संदर्भातील कामे हि दक्षिण आग्नेय भागात केली जावीत. तर उप्तादनाच्या प्रक्रियेतील शेवटचा टप्पा उत्तर वायव्य भागात आणण्याचा प्रयत्न करावा.


कारखान्यातील कार्यालयाचा विचार करता ते नेहमी पश्चिम मध्य भागात असावे. जेणेकरुन संपूर्ण कारखान्यावर लक्ष तर राहतेच पण पश्चिम दिशेमुळे मालकही स्थिर राहतो. तसेच तो थेट नैऋत्य भागात न गेल्याने एक हाती कारभार राहात नाही. कामगारांच्या आरोग्याचा विचार करता त्यांचे विश्रांतीगृह नेहमी पूर्व भागात अथवा पूर्व ईशान्य भागात असावे. यामुळे कामगाराला विश्रांतीच्या काळात ऊर्जा मिळुन तो नव्या जोमाने कामास लागतो. विजे संदर्भातील सर्व उपकरणे जसे कि मीटर रुम, जनरेटर बॅकअप हे सर्व पूर्व आग्नेय भागात असावे. या भागात वारा खेळता नसल्यामुळे शॉर्टसर्किट ने अथवा इतर कारणाने लागलेली आग सहसा पसरत नाही. तसेच ऊर्जेची हि दिशा असल्याने उपकरणे अधिक काळापर्यंत कार्यरत राहतात. गुणवत्ता तपासणीचे कार्यालय हे त्या नंतर पूर्व आग्नेय भागातच यावे.


मी सातत्याने सांगत असतो कि जेव्हा लक्ष्मी आपल्याकडे यावी अशी इच्छा आपण व्यक्त करतो, तेव्हा तीला यावंसं वाटेल असे वातावरणही आपण निर्माण करायला हवे. उत्पादन कशाचेही असो कारखान्यात स्वच्छतेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. यातुन आपली वास्तु सुंदर तर दिसतेच पण कामगारांचे आरोग्यही टिकुन राहते. तसेच इतस्ततः पडलेल्या सामानामुळे अथवा ऑइलसारख्या पदार्थांमुळे होणारे अपघातही टाळले जातात. कारखान्यातील टाकाऊ वस्तुंचेही योग्य नियोजन आवश्यक आहे. कारण अनेक कारखान्यांमध्ये याचा पुनर्वापर केला जातो तर काही ठिकाणी स्क्रॅप मालाची सुद्धा विक्री केली जाते. असा टाकाऊ माल नैऋत्येला ठेवणे अधिक योग्य.

इथे सर्वच मुद्द्यांचा परामर्श घेणे शक्य नाही. कारण अनेक निर्णय हे ती ती वास्तु बघुनच घ्यावे लागतात. पण एक नक्की कि वास्तुतील विविध दिशांचा आणि ऊर्जेचा अभ्यास करुन कारखान्याचे नियोजन केल्यास उत्पादन क्षमता वाढुन अधिकाधिक प्रगती साधता येईल. 

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com

Sunday, 23 October 2016

चतुर्थ स्थान

 
सुख स्थान - मातृ स्थान असेही या स्थानाला म्हणले जाते. वास्तु - वाहन सुखा विषयी सांगणारे हे स्थान आहे. वास्तुपासुन मिळणारे सुख, वास्तु दोष यांचा अभ्यास या स्थानावरुन करता येतो. विद्या अभ्यासाचा विचार या स्थानावरुन होतो. आयुष्याच्या शेवटच्या काळातील परिस्थितीही या स्थानावरुन कळते.

हे केंद्र स्थान असुन पंचमेश अथवा भाग्येश इथे असता किंवा चतुर्थेश पंचमात अथवा भाग्यात असता राजयोगी होतो. चतुर्थेश द्वितीयात असता स्वस्थानापासुन लाभात जाउन धनप्राप्ती चांगली होती. चतुर्थेश पंचमात स्वपराक्रमाने श्रीमंती दाखवतो. सप्तमात जाता विवाह लवकर होतो. दशमात येता मान हुद्दा तसेच वरिष्ठ दर्जाची नोकरी मिळते. षष्ठात, अष्टमात अथवा व्ययात जाता मात्र चतुर्थ स्थानाच्या फलितांमध्ये कमतरता आणतो.

चतुर्थ स्थान हे मातृ स्थान असुन इथे चंद्र दिग्बली ठरतो. गुरु हा शुभ ग्रह असुन सुखाचा कारक आहे. चतुर्थातील गुरूला राशीची साथ मिळता तो विशेष फलदायी ठरतो. वैवाहिक सुखाचा कारक चतुर्थात शुभ फलदायी ठरतो. विशेष करुन तुळेतला अथवा मीनेतला शुक्र कला क्षेत्रात मोठे यश देतो. तुळ लग्नाला चतुर्थातील योगकारक शनि राजयोगी ठरतो. इथे रवि विशेष फलदायी ठरत नाही. चतुर्थातील राहु केतु सुखात कमतरता आणतात. चतुर्थातील नेपच्युन आयुष्याचा शेवटचा काळ कष्टदायी करतो. तर हर्षल सातत्याने वास्तुतील बदल दर्शवतो.

वाहन सुखाचा विचार करताना चतुर्थ स्थान,चतुर्थ स्थानाचा स्वामी कारक ग्रह शुक्र यांचा विशेषत्वाने विचार करावा. त्याच प्रमाणे चतुर्थाला पाहणारे ग्रह, चतुर्थेशला पाहणारे ग्रह, चतुर्थातील ग्रह यांचा अभ्यास महत्वाचा ठरतो. त्याच पद्धतीने पंचम नवम स्थानाचा अभ्यासही करावा. वास्तु सुखाचा विचार करताना चतुर्थ स्थान, स्थानाचा स्वामी कारक ग्रह मंगळ याचा विचार करावा. तसेच आधी म्हणाल्याप्रमाणेच चतुर्थाला पाहणारे ग्रह, चतुर्थेशला पाहणारे ग्रह, चतुर्थातील ग्रह यांचा अभ्यास करावा. वास्तु सुखाचा अभ्यास लग्न लग्नेशाशिवाय अपुर्ण आहे. वास्तु - वाहन योगाचा विचार करताना चतुर्थेश - चतुर्थातील बलवान ग्रह - कारक ग्रह मंगळ/शुक्र यांच्या दशा भुक्ती काळाचा अभ्यास करावा. तसेच यांच्या गोचर स्थितीचा अभ्यासही महत्वाचा ठरतो. बुद्धिमत्तेचा दर्जा - शिक्षणाचे योग याचाही अभ्यास याच पद्धतीने केला जातो. बुद्धीचा कारक ग्रह बुध आहे.        

विविध स्थांनांविषयी बोलत असताना एक गोष्ट जी मी सातत्याने मांडत आलो आहे, ते म्हणजे एखाद्या स्थानाच्या फलिता मध्ये वृद्धी करण्याची अथवा कमतरता आणण्याची ताकद/सूत्रे लग्न-लग्नेशाकडे आहेत. त्यामुळे कुठल्याही स्थानाचे फलित वर्तवण्या आधी लग्न लग्नेशाचे बल तपासणे गरजेचे आहे. वास्तु वाहन हे आजच्या काळात महत्वाचे टप्पे आहेत. तर आयुष्यात धावत असताना सुखाची समाधानाची आस सर्वांना असते. याचसाठी केला अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा, हा विचार सर्वांच्याच मनी असतो. आणि म्हणुनच आयुष्यात पुढे जात असताना चतुर्थ स्थान तपासणे महत्वाचे ठरते.  

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र वास्तुशास्त्र रमलशास्त्र होराशास्त्र हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९   info.bhagyank@gmail.com

विवाह योग

वाढती महागाई, भ्रष्टाचार, अच्छे दिनचा पडलेला विसर या शब्दांनी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरत असले तरी माझ्या सारख्या ज्योतिषाचे तरी असे मत झाले आहे कि विवाहयोगा इतका दुसरा कुठलाच मोठा प्रश्न माणसाच्या जीवनात असु शकत नाही. हे असे वाटण्याचे कारण म्हणजे सातत्याने याच विषयासंदर्भात भेटणारे जातक. म्हणजे आज आमच्याकडे येणाऱ्या जातकांच्या प्रश्नांचे वर्गीकरण केले असता निम्म्याहुन अधिक प्रमाणात जातक विवाहयोग विचारण्यासाठीच येत असतात. आणि म्हणुन माझे एक मत बनले आहे कि बाकी काही म्हणो सध्यातरी विवाहयोग हाच महत्वाचा प्रश्न आहे.
पण त्याचवेळी हा हि विचार मनात येतो कि हे असे का? इतर जटिल प्रश्न समोर असताना हाच प्रश्न इतका महत्वाचा का? याच्या उत्तराचा विचार करताना दोन पिढ्यांमधील अंतराचा आपण विचार केला पाहिजे. आत्ता विवाहयोग्य असलेल्या मुलामुलींचे पालक ज्या पिढीतले आहेत त्या पिढीत २१ व्य वर्षी लग्न तर २५ व्या वर्षी पदरी दोन मुल अशी सामाजिक पद्धती होती. पदवी पर्यंतचे शिक्षण हीच खुप मोठी बाब होती आणि तेवढ्या शिक्षणावरही सहज नोकरी मिळत होती. नोकरी आली कि छोकरीही निश्चित होती. काही अपवाद वगळता सर्वसाधारण गणित हे असेच होते. सध्या मात्र परिस्थिती वेगळी आहे. सर्वत्र स्पर्धा इतकी वाढली आहे कि कितीही शिक्षण घेतले तरी ते अपुरेच वाटते. यामुळे शिक्षणाचे वय २५ ते अगदी ३० पर्यंत जाऊन पोहचले आहे. त्या पुढे किमान दोन वर्ष करिअर आणि मग लग्न. या अर्थाने बहुतांशी लग्नाचे वय हे कमीत कमी २६ पर्यंत पुढे आले आहे. आणि हे २१ ते २६ मधलं पाच वर्षाचं अंतर पालकांना अधिक चिंतेत टाकत. आणि हे अंतर जसं जस वाढत जात तस तास हा प्रश्न ऐरणीवर येऊ लागतो. आणि मग मी वर म्हणल्या प्रमाणे याच्या इतका दुसरा कुठलाच महत्वाचा प्रश्न जातकाच्या आयुष्यात राहात नाही. मग जातक पालक असोत कि स्वतः मुलगा/मुलगी.
मग या प्रश्नातुन बाहेर पडण्याचा मार्ग काय? आपण आपल्या मुलाची/मुलीची कुंडली अधिकारी ज्योतिषाकडे दाखविणे. त्यांच्याकडुन विवाहाचे योग जाणुन घेणे. आणि योग्य वेळी विवाहासाठी प्रयत्न सुरु करणे. काय आहे कि स्टेशनवर येणाऱ्या गाडीची वेळ असते. जो दोन तास आधी येऊन थांबतो, त्याला ती दोन तासाने आली असे वाटते. तर एखादा ऐनवेळी येतो, अगदी चालत्या गाडीत चढतो. त्याला वाटत आपण आलो आणि लगेच गाडी मिळाली. आपल्याला एवढं ऐनवेळी जरी जायचं नसलं तरी गाडी स्टेशनवर यायची वेळ आणि आपण स्टेशनवर जायची वेळ यात योग्य अंतर असेल तर हे मधले अंतर निश्चितच तणावरहित व आनंदाचे असु शकते. आता हे मधले अंतर किती असावे याचा निर्णय जरी ज्याचा त्यानी घ्यायचा असला तरी गाडीची वेळ मात्र आपण अधिकारी ज्योतिषालाच विचारायला हवी.
या चिंतेमागे अजुन एक कारण दिसुन येते ते म्हणजे या काळात विविध ज्योतिषांकडुन केला जाणारा विविध उपायांचा मारा. हे सर्व उपाय यथाशक्ती (अनेकदा तर यथाशक्तीच्याही पुढे) करुन सुद्धा जेव्हा विवाह योग जुळुन येत नाही तेव्हा चिंतेत अधिक भर पडते. उपायांच्या बाबतीत एक मत माझे ठाम राहिलेले आहे कि, "An Astrologer can Read Your Future, He cannot Change Your Future." एखाद्या उपायाने जर गाडी वेळेच्या आधी येणार असती तर भारताने सुपरफास्ट इंजिन घेण्या ऐवजी प्रत्येक स्टेशनवर एक ज्योतिषीच बसवला असता. पण असे होऊ शकत नाही. काही उपाय निश्चित माणसाला मानसिकता बदलायला मदत करतात.ज्याचा उपयोग त्याला निर्णय प्रक्रियेमध्ये मदत करतो. तसेच काही उपाय जातकाला ऊर्जा देणारेही असतात. या कारणास्तव एखादा उपाय कोणी सांगत असेल तर तो जरुर करावा. मात्र एखाद्या उपायाने विवाहयोग लवकर येईल असा दावा कोणी करु पाहात असेल तर त्यावर विश्वास ठेवु नये. यातुन निराशाच पदरी पडते.
या सर्वाचा सार इतकाच विवाह योग हा पूर्वनियोजित आहे. त्यामुळे त्या विषयी पालकांनी अथवा मुलांनी/मुलींनी चिंता बाळगु नये. हा योग कधी आहे हे जाणुन घेतल्यास कदाचित विवाहापर्यंतचा प्रवास अधिक सुखकर होऊ शकतो.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com

Saturday, 15 October 2016

गुणमेलन अधिक ग्रहमेलन

खरं तर हा विषय मी सातत्याने मांडत आलोय कि गुण मेलना इतकेच महत्व ग्रहमेलनालाही देणे गरजेचे आहे, पण काही ठिकाणी हा विषय टाळला जातो. आणि मग केलेले भाकीत चुकण्याची शक्यता निर्माण होते.

गुणमेलन हे चंद्र राशीवरुन केले जाते. चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे या पद्धतीतुन वधुवर स्वतःला सुयोग्य आहेत कि नाही हे ठरते. परंतु विशेषत्वाने सध्याच्या काळात जिथे स्त्री पुरुषांना स्वतंत्र निर्णय स्वातंत्र्य आहे, बहुतांशी अर्थार्जनाने स्वतंत्र आहेत तिथे फक्त मनाचा विचार न करता कुंडलीतील इतर स्थानांचा विचारही महत्वाचा ठरतो. आणि म्हणुनच चंद्रा इतकच इतर ग्रहांचे योग तपासणंही महत्वाचं ठरत.

विषय अधिक स्पष्ट करण्यासाठी सोबत एक उदाहरण देत आहे.


इथे पारंपरिक गुणमेलन पद्धती मध्ये २० गुण जुळतात, ज्या नियमाने पुढे जाण्यास हरकत नसावी.

ग्रहमेलनाचा विचार करता लग्न राशींचा नवपंचम योग आहे मात्र लग्नेश एकमेकांच्या केंद्रात आहेत. सप्तमेशांची प्रतियुती आहे. व दशमेश देखील प्रतियुती मध्ये आहेत.पंचमेश व कुटुंबेश लाभात तर चतुर्थेश नवपंचमात हीच काय जमेची बाजु आहे. रवि, मंगळ व शुक्र षडाष्टक योगात आहेत. चंद्र प्रतियुती तर गुरुचा एक राश्यांतर योग आहे. बुध नवपंचम तर शनि एका राशीत हीच काय ती जमेची बाजु आहे.

ग्रहमेलनाचा विचार करता मात्र हे स्थळ पुढे जाण्यास तितकेसे योग्य नाही.

आता आपण फक्त गुणमेलनाचा विचार करुन पुढे जा असे म्हणले असते तर ते तितकेसे योग्य ठरले नसते.
म्हणुनच विवाहासारखा महत्वाचा निर्णय घेताना, गुणमेलना बरोबरच ग्रहमेलनाचाही विचार केला गेला पाहिजे.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com

Tuesday, 4 October 2016

पैशाची पेटी / तिजोरी आणि वास्तुशास्त्र


आज सर्वत्रच प्लॅस्टिक मनी किंवा कार्ड बँकिंग किंवा ऑनलाईन ट्रँझॅकशन चा सुळसुळाट असला तरी काही व्यावसायिक क्षेत्रांमध्ये रोख रकमेचा संबंध आहेच. अर्थ क्षेत्रातील संस्था, रिटेल दुकाने, दागिन्यांची दुकाने, हॉटेल अथवा भाजीपाल्याची दुकाने या सर्वच व्यवसायांत रोज रोख रकमेचा संबंध येतो. अशावेळी हि रोख रक्कम ठेवायची पेटी अथवा मोठ्या अर्थाने तिजोरी कोणत्या दिशेस असावी याचा विचार वास्तुशास्त्रामध्ये केला आहे.



सोबत दिलेल्या चित्राप्रमाणे आपल्या वास्तुचे नऊ भाग पाडले असता, पैशाची पेटी / तिजोरी उत्तर भागात दक्षिण भिंतीला उत्तरेकडे उघडणारी असावी. व्यावसायिक जागेचा आकारमान लहान असता कदाचित हे शक्य होणार नाही. मागे नैऋत्य भागाचे महत्व सांगणारा लेख लिहिताना आपण दुकानात मालकाची जागा नैऋत्य भागात सांगितली आहे. आणि पैशाची पेटीही मालकाच्या जवळ असते. त्यामुळे थेट उत्तर भागात पैशाची पेटी करणे शक्य होत नाही. अशावेळी मालकाच्या इथेच पण दक्षिण दिशेला उत्तरेकडे उघडणारी पैशाची पेटी ठेवावी. शक्य झालं तर दोन पेट्या कराव्यात. एक मालकाच्या इथे दिवस भराच्या व्यवहारासाठी तर मुख्य पेटी वर सांगितल्या प्रमाणे उत्तर भागात.

पैशाच्या पेटीच्या बाबतीत एक महत्वाचा नियम लक्षात ठेवावा. पैशाची पेटी कधीही मोकळी नसावी. त्यात किमान काही ना काही रक्कम असावी. पैशाच्या पेटीमध्ये रोख रकमेबरोबर काही सुट्टी नाणीही ठेवावीत. पैशाची पेटीही नेहमी स्वच्छ व सुंदर असावी. त्यात पैशाव्यतिरिक्त इतर सामान टाकु नये. फाटक्या नोटा/जुन्या नोटा/खराब झालेली नाणी अशा वस्तु पैशाच्या पेटित ठेवु नयेत. शक्य झाल्यास पैशाच्या पेटीत रोज ताजे फुल ठेवावे. त्यावर मालकाने अथवा व्यवसायाच्या प्रमुखाने रोज स्वस्तिक काढावे. हिंदु धर्मीयांव्यतिरिक्त इतर धर्मीयांनी आपापल्या धर्माचे शुभं चिन्ह ठेवावे.

घरामध्येही सध्या काही उच्च वर्गीय कुटुंबे वगळता मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम अशी कोणी घरात ठेवत नाही. मात्र जिथे ती ठेवली जाते, तिथे अथवा ज्या घरात किमान रक्कम ठेवली जाते त्या घरातही वरील नियम पाळावेत. शक्य झाल्यास घराच्या उत्तरेकडील खोलीत दक्षिण भिंतीला असे कपाट असावे. अथवा शयनगृहात दक्षिणेकडील भिंतीला उत्तरेकडे उघडणारे कपाट असावे. आपले दागदागिने, बँक खात्याची पुस्तके हे सुद्धा याच दिशेला असावे.

हे झाले मुळ नियम. मात्र ज्योतिष शास्त्राप्रमाणेच वास्तुशास्त्राचे नियम हे वास्तुसापेक्ष असुन वेगवेगळ्या वास्तुमध्ये या नियमांत कमी अधिक प्रमाणांत बदल करावे लागतात. त्यामुळे एकदा आपली वास्तु वास्तुशास्त्राप्रमाणे जरुर तपासुन घ्यावी.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com

Monday, 19 September 2016

शनि - मंगळाची सुटली युती ...



फेब्रुवारी २०१६ ला मंगळाने वृश्चिक राशीमध्ये प्रवेश केला. १७ जुनला वक्री मार्गे मंगळ मागे तुळ राशीमध्ये प्रवेश केला. तद नंतर तो पुन्हा मार्गी होऊन १२ जुलैला त्याने वृश्चिकेत प्रवेश केला. आणि आज १९ सप्टेंबर २०१६ ला मंगळाने धनु राशीमध्ये प्रवेश केला.

या काळात शनि वृश्चिक राशीमध्येच होता. विशेष करुन २५ मार्च ते १३ ऑगस्ट या काळात वृश्चिकेतच शनि वक्री होता. ह्या सर्व प्रवासात २४ ऑगस्टला शनि मंगळाची अंशात्मक युती झाली. इतर वेळेस अंशात्मक युती नसली तरी, वृश्चिक सारख्या स्फोटक राशीमध्ये स्फोटक मंगळ आणि विलंब व अडथळ्यांचा द्योतक शनि फार मोठा काळ एकत्र होते.

याची दाहकता विशेषत्वाने साडेसाती चालु असलेल्या तुळ, वृश्चिक व धनु राशींनी अनुभवली. त्याच वेळी पनौती चालु असलेल्या मेष व सिंह राशीलाही याचा त्रास झाला. कुंभ राशीला दशमात तर मकरेला लाभात राशिस्वामी शनिचा मंगळाशी सहयोग झाल्याने करिअरच्या दृष्टीने हा काळ खडतर गेला. कर्केला पंचमातुन हा योग झाल्याने संतती सौख्यासाठी तर मीनेला सप्तमातुन हा योग झाल्याने विवाहयोगासाठी वाट पहावी लागली. मिथुनेला षष्ठातून तर मेषेला अष्टमातुन हा योग झाल्याने आरोग्याचे प्रश्न उभे राहिले. काहींना शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले तर त्यातही काहींच्या शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्या.

जसे विविध राशींनी याचे परिणाम भोगले तसेच विशोंत्तरी दशांनाही याची झळ पोहचली. ज्यांचा कुंडलीत शनि अथवा मंगळाची महादशा/अंतर्दशा/विदशा चालु होती त्यांना मोठ्या प्रमाणावर अडचनींना सामोरे जावे लागले. शनि वक्री असताना याची परिणामकारकता अधिक होती. ज्यांचा कुंडलीमध्ये शनिच्या महादशे मध्ये मंगळाची अंतर्दशा अथवा अंतर्दशेमध्ये विदशा किंवा मंगळ महादशेमध्ये शनिची अंतर्दशा अथवा अंतर्दशेमध्ये विदशा चालु होती त्यांना हे परिणाम अधिक अधोरेखित झाले.

या काळात राजकीय पटलावर सत्ताधारी पक्षाचे अनेक डावपेच अपयशी ठरताना आपण पहिले. महामार्गावर अपघात होत असतात पण त्यांच्या संख्येतील वाढ या काळात अनुभवास आली. संरक्षण क्षेत्राचा विचार करत असताना सैन्यावरचे व पोलिसांवरचे वाढते हल्लेही आपण या काळात पाहिले.

आता मंगळ धनु राशीमध्ये मार्गस्थ झालेला आहे. व पुढचा फार मोठा काळ शनि मंगळाची युती होणार नाहीये. त्यामुळे विशेषत्वाने ज्या राशींना साडेसाती अथवा पनौती असणार आहे, त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकायला हरकत नाही.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ ।  info.bhagyank@gmail.com

Thursday, 15 September 2016

व्यावसायिक जागा आणि नैऋत्य दिशा

मागच्या आठवड्यात नैऋत्य दिशेचे महत्व सांगणारा लेख लिहिला होता. त्या लेखात नैऋत्य दिशेविषयी लिहितांना अधिकांश संदर्भ घराचा दिला होता. या लेखात व्यावसायिक जागेच्या अनुषंगाने काही मुद्दे देत आहे.

काल एका बेकरी उत्पादने विकणाऱ्या दुकानाची वास्तु पाहण्याचा योग आला. या पुर्वीही एका बेकरीची उत्पादने विकणाऱ्या ब्रँडच्या काही शाखांची वास्तु भेट केली होती. तो पूर्वानुभव गाठीशी होताच.  जातकाने खरं तर दोन एक आठवड्या मागेच या वास्तु संदर्भात फोन केला होता. सदर व्यवहार पुढे न्यायच्या दृष्टीने किमान चर्चा फोनवरुन झाली. जातकाने दुकानाच्या दिशा सांगताच, आधीच्या मालकाला येत असलेल्या अडचणी सांगताच वास्तुमध्ये काय महत्वाचा दोष असेल हे पूर्वानुभवावरुन सांगितले. ज्यात विशेष करुन कॅश बॉक्स वायव्येला असु शकतो अधिकतर वजन पूर्व - उत्तर भागात असेल, असे दोन वास्तु दोष सांगितले होते. मात्र यात सहज बदल करणे शक्य असुन व्यवहार पुढे न्यायला हरकत नाही असेही सुचवले.

जातकाने व्यवहार पुढे नेला काल मला प्रत्यक्ष वास्तु पाहण्यास बोलावले. खरे तर वास्तु पाहण्यासाठी आधी मागील आठवड्यात ऋषीपंचमीला दुपारी ०२:०० च्या दरम्यान जाणार होतो. पण मी नेहमीच मानत आलोय कि वास्तु आणि कुंडलीचा निश्चितच परस्पर संबंध आहे. या जातकाच्या बाबतीत तेच अनुभवास आले. काही वैयक्तिक कारणाने ऋषी पंचमीला होणारी भेट रद्द झाली. त्या वेळी निसर्ग कुंडलीमध्ये पुण्यात धनु लग्न चालु होते. काल संध्याकाळची भेट अचानक ठरली. आणि काल सांयकाळी पुणे येथे निसर्ग कुंडलीमध्ये मीन लग्न चालु असताना वास्तु भेट झाली. जातकाच्या कुंडलीचा अभ्यास करता दशमामध्ये म्हणजेच कर्म स्थानामध्येही मीन रासच आहे.

आता त्या वास्तु विषयी बोलु. सोबत दोन चित्रे जोडली आहेत. एकामध्ये वास्तुची सद्य स्थिती तर एकामध्ये आम्ही सुचवलेले बदल दिले आहेत. वास्तूचे प्रवेशद्वार उत्तरेला असुन मुख्य रस्ताही उत्तरेलाच आला आहे. अधिक वजन हे पश्चिम भागात आहे. तर पूर्व भाग पूर्ण मोकळा आहे. या वास्तुच्या सर्वात जमेच्या बाजू आहेत. वास्तु आयता कृती असुन कुठलीच दिशा कमी अथवा जास्त झालेली नाही. या वास्तुचा मालक वास्तु पासुन दुर राहात असुन त्याच्या अशा अनेक शाखा आहेत. मात्र या शाखेला त्याला म्हणावा तसा वेळ देता येत नाहीये. व्यवसायातील गुंतवणुकीच्या तुलनेत उत्पन्न मात्र कमी आहे.

उत्तर प्रवेशद्वार असताना किंवा इतर जमेच्या बाजु असतानाही या अडचणी का? हा प्रश्न स्वाभाविकपणे येतो आणि मग आठवण येते ती नैऋत्य दिशेची. वास्तु शास्त्राच्या नियमानुसार वस्तुमानाची तुलना करताना नैऋत्य दिशेला अधिक जडत्व हवे. मात्र इथे फ्रीजची रचना करताना वायव्य भागातुन फ्रीज चालु होतो आणि त्याचा काही भाग नैऋत्येला येतो. या उलट नैऋत्येला काउंटरच्या आत येण्या-जाण्यासाठी जागा सोडली आहे. त्यामुळे आपोआपच नैऋत्य दिशा जडत्वाच्या मानाने हलकी झाली. व्यावसायिक प्रगतीसाठी मालकाने नैऋत्येला असायला हवे. इथे मात्र नैऋत्येपासून येण्या जाण्याची जागा सोडल्याने आपसुकच मालक वायव्येला आला. वायव्य दिशा वायु देवतेची असुन इथुन ऊर्जा बाहेर जाते. यामुळे हि शाखा ज्यांची आहे, त्यांनाच तिथे थांबायला वेळ मिळत नाही. मालकाची जागा वायव्येला आल्याने आपसुकच कॅश बॉक्स वायव्येला आला. त्यामुळे आलेला पैसा टिकणे हा अनुभव येऊ लागला. त्यातुनच आवक कमी आणि जावक जास्त अशी स्थिती झाली. आणि त्यातूनच शेवटी त्याने ती शाखा दुसऱ्याला म्हणजेच माझ्या सद्य जातकाला देण्याचा निर्णय घेतला.

या वास्तुत प्रवेश करताच एक भाग मला जाणवला कि या वास्तुत शुभत्व असुन लक्ष्मी योग आहे. अडचण आहे ती चुकीच्या वस्तुमानाची. त्यामुळे आम्ही जातकाला सहज सोपे दोन बदल सांगितले. एक म्हणजे फ्रीज पुर्ण नैऋत्य भागात सरकवावा. आत येण्या जाण्यासाठी वायव्येकडून जागा मोकळी सोडावी. दुसरा बदल असा कि कॅश बॉक्स दक्षिण भागात ठेवावा तो उत्तरेकडे उघडेल अशी योजना करावी. या व्यतिरिक्त प्रवेशद्वार जे अगदीच कोपऱ्यामध्ये आले आहे, ते थोडे पुढे ओढुन घ्यावे.

व्यावसायिक जागेमध्येही नैऋत्य जागेला अनन्य साधारण महत्व आहे कारण ती मालकाची जागा आहे. कार्यालयीन जागा असल्यास नैऋत्येकडे पण दक्षिण भागात मुख्य मालकाची केबिन असावी. त्या खालोखाल जबादारी नुसार अधिकाऱ्यांच्या केबिन दक्षिण पश्चिम दिशेने वाढवत जाव्यात. कारखान्याच्या ठिकाणी नैऋत्य भागात पण अधिकतर दक्षिण दिशेने कामकाजाचे मुख्य कार्यालय असावे. तर कामाच्या रचनेला महत्व देत अधिक जड यंत्रांची योजना नैऋत्य भागात त्या खालोखाल पश्चिम भागातुन नंतर दक्षिण भागातुन यंत्रांची रचना करावी.

दिशांचा विचार करुन पुढे गेल्यास निश्चितपणे व्यवसायात सुख-समाधान-प्रगती साधता येते.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र वास्तुशास्त्र रमलशास्त्र होराशास्त्र हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९   info.bhagyank@gmail.com