Sunday, 28 January 2018

वास्तु योग आणि जन्म कुंडली


स्वतःची वास्तु होणे हा आयुष्यातला खुप महत्वाचा टप्पा असतो. काही जण हा टप्पा विवाहा आधीच गाठतात तर काही जण विवाहा नंतर. काही जण रोख रक्कम देऊन स्वतःची वास्तु घेतात तर काही जण कर्ज काढुन. काही जणांच्या वास्तु खरेदीमध्ये वैवाहिक जोडीदार आर्थिक रुपाने भागीदार असतो, तर काही जण एकट्याच्या बळावर वास्तु खरेदी करतात. काही जण करिअरच्या सुरवातीच्या टप्प्यात वास्तु खरेदी करतात तर काही मध्यल्या तर काही निवृत्तीनंतर स्वतःची वास्तु करतात.

हे एक यश असते जे सर्वांना मिळवायचे असते. या यशा पर्यंत पोहोचायचा मार्ग सोप्पा नसतो. आर्थिक कौटुंबिक स्तरावर मोठी कसरत चालु असते. वास्तु विषयी प्रत्येकाच्या मनात काही स्वप्न असतात आणि वास्तु खरेदी करताना हि स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. घरातल्या सर्वांनाच खूश करता येत नाही पण प्रत्येकाला आवडेल असा निर्णय ह्यवा लागतो. हा निर्णय घेताना सध्या घरांच्या वाढत्या किमती हा हि एक प्रश्न आहेच. त्यामुळे प्रत्येक वेळी मनातील स्वप्न प्रत्यक्षात उतरेलच असे नाही.

हा जो वास्तु योग आहे, हि जी स्वप्नपूर्ती आहे, हा जो महत्वाचा टप्पा आहे, हा कधी येईल, कसा येईल व कुठे येईल हे आपली जन्म कुंडली सांगत असते. लग्न लग्नेश आपली इच्छाशक्ती दाखवते, धन स्थान आपली आर्थिक कुवत दाखवते, चतुर्थ स्थान वास्तु सुख आहे किंवा नाही आणि असेल तर कसे या विषयी सांगते, भाग्य स्थान आपल्या वास्तु योगाचा मार्ग सांगते, लाभ स्थान इच्छा पूर्ती होईल कि नाही हे सांगते तर व्यय स्थान कर्ज तसेच कायदेशीर बाबींविषयी सांगते. या सर्व स्थानांचा अभ्यास करता आपल्याला वास्तू योग कळतो.

हा विषय अधिक स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण सोबत देत आहे. यातील तांत्रिक भाग सर्व वाचकांना नाही कळणार मात्र वास्तु योगाचे महत्व निश्चितच लक्षात येईल. या जातकाने २०१७ च्या सप्टेंबरमध्ये वास्तु घेतली. हि पुनःर्विक्री केलेली वास्तु आहे. कर्क लग्नाची हि कुंडली असुन लग्नेश चंद्र भाग्य स्थानामध्ये शनिच्या नक्षत्री नीच नवमांशी राजयोगी आहे. तो नीच नवमांशी असल्याने या राजयोगाचे बळ कमी होते. या जातकाच्या धन स्थानामध्ये सिंह रास असुन धनेश रवि व्यय स्थानामध्ये आहे. यामुळे सततच्या कर्जाच्या अंगाने जाणारी हि कुंडली आहे. चतुर्थात शुक्राची तुळ रास असुन चतुर्थेश शुक्र लाभ स्थानामध्ये स्वराशीचा उच्च नवमांशी आहे. यामुळे वास्तु वाहन सुखाला उत्तम कुंडली आहे. अष्टमेश शनि चतुर्थात आल्याने व तो तिथे केतु बरोबर असल्याने जातकाने जुने व पुनःर्विक्री केलेले घर खरेदी केले. भाग्य स्थानामध्ये चंद्र राजयोगी आहे, तर भाग्येश गुरु सप्तमात राजयोगी आहे. इथे गुरु नीच राशीमध्ये असला तरी तो उच्च नवमांशी आहे. लाभ स्थानामध्ये लाभेश शुक्र स्व राशीचा उच्च नवमांशी आहे. तर व्यय स्थानामध्ये रवि मंगळ व व्ययेश बुध लग्नी असा योग आहे.

२०१७ मध्ये जातकाची शुक्राची महादशा म्हणजेच वास्तुकारक चतुर्थेशाची महादशा चालु होती. शुक्र महादशेमध्ये शुक्र अंतर्दशेत जातकाने वास्तु नियोजित केली, तर सप्टेंबर २०१७ मध्ये रविच्या अंतर्दशेमध्ये म्हणजे धनेशाच्या अंतर्दशेमध्ये वास्तु खरेदी केली. रवि अंतर्दशेत देखील चंद्राची म्हणजेच लग्नेशाची तसेच भाग्यातील ग्रहाची विदशा चालु असताना व्यवहार पुर्ण होऊन वास्तु प्रवेश झाला.

आपण खुपदा म्हणतो कि मी वास्तु घेतली, पण ती घेण्यासाठी वास्तुतील ग्रहयोगही तितकेच कारणीभुत असतात. या उलट आपण आपली वास्तु व्हाव्ही म्हणुन खुप धडपड करतो पण व्यवहार मार्गी लागत नाही, कारण त्यावेळी आपला वास्तु योग आलेला नसतो. हा लेख खास करुन त्या  लोकांसाठी आहे ज्यांचा अद्याप वास्तुयोग आलेला नाही. धीर सोडु, नका हताश होऊ नका आपल्याही कुंडलीमध्ये वास्तु योग निश्चितच येईल.


- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://www.facebook.com/BhagyankJyotishVVastushastraSallaKendra/ 

Friday, 12 January 2018

विवाह योग



मुलामुलींचे शिक्षण पूर्ण होते, ते अर्थार्जनाला लागतात आणि आई वडिलांची लग्नासाठी घाई सुरु होते. काहींचे लग्न एका झटक्यात ठरुनही जाते तर काहींचे लग्न ठरता ठरत नाही. सुरवातीचा काही काळ विवाह योगच नसेल म्हणुन काढला जातो, पण जस जसा उशीर होत जातो तस तशी आई वडिलांची काळजी वाढु लागते. मग ज्योतिषांकडचे हेलपाटे वाढतात. विविध उपाय, यज्ञ याग, मंत्र तंत्र सुरु होतात. पण नक्की विवाहयोग कधी आहे याचा कोणीच विचार करत नाही.

खरे तर विवाह योग हा विवाहासाठी स्थळे बघायला सुरवात करण्या आधीच तज्ञ ज्योतिषाकडून तपासला पाहिजे. काही वेळेस विवाह योग खुप लांब असतो आणि आपण खुप आधीच स्थळं बघायला सुरवात करतो. याचा परिणाम मुलामुलींच्या करिअरवर सुद्धा होऊ शकतो. काहीवेळेस स्थळ नापसंत झाल्याने मुलामुलींमध्ये नैराश्य येते. तर कधी कधी विवाह संस्थेविषयीच अनास्था निर्माण होते.

या उलट विवाह योगाचा कालावधी लक्षात आला (इथे विवाहाची तारीख वगैरे अजिबात अपेक्षित नाही), वधु अथवा वराची दिशा लक्षात आली, तो कसा असेल हे लक्षात तर योग्य वेळी योग्य प्रयत्न होतात. आणि मनासारखे स्थळ मिळुन दोन्हीकडची मंडळी आनंदी होतात. मुलीच्या लग्नात बापाची चप्पल झिजते असे म्हणतात. खरे हि असेल ते. पण किती चप्पला झिजाव्यात याचाही विचार व्हायलाच हवा.

लग्न योग्य वयात होण्याच्या अट्टाहासापेक्षा योग्य वेळी होणे अधिक योग्य नाही का? अनेक श्रद्ध आणि अंधश्रद्ध उपायांच्या मागे लागण्यापेक्षा याच काळात मुलामुलींना मानसिक दृष्ट्या तयार करणे अधिक गरजेचे नाही का? अपेक्षा असायलाच पाहिजेत पण त्या इतक्याही नसाव्यात कि हाती फक्त उपेक्षाच येईल.

म्हणुनच मुलाच्या अथवा मुलीच्या विवाहासाठी स्थळे बघायला सुरुवात करण्यापूर्वी एकदा विवाहयोग, मुलगा कसा असेल, कुठल्या दिशेचा असेल या यासारख्या अनेक गोष्टींविषयी मार्गदर्शन जरुर घ्यावे.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र वास्तुशास्त्र रमलशास्त्र होराशास्त्र हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://www.facebook.com/BhagyankJyotishVVastushastraSallaKendra/