Friday, 25 August 2017

रत्न आणि परिवर्तन योग


जन्म कुंडलीमध्ये जर दोन ग्रह एकमेकांच्या राशीमध्ये असतील तर त्याला परिवर्तन योग असे म्हणतात. राशीप्रमाणेच हा योग नक्षत्र तसेच नवमांशातुनही तपासला जातो. हा एक राजयोग असुन शुभ स्थानांतुन तसेच शुभ ग्रहांमध्ये झाल्यास उच्च प्रतीचा योग मानला जातो.
रत्नशास्त्रा नुसार षष्ठ स्थानातील अथवा अष्टम स्थानातील अथवा व्यय स्थानातील ग्रहांचे रत्न धारण केले जात नाही.
असा ग्रह जर परिवर्तन योगाने शुभ स्थानामध्ये येत असेल तर स्वराशीचा म्हणुन त्याचे रत्न धारण करण्यास हरकत नाही. किंबहुना शुभ स्थानामध्ये येणारा ग्रह राजयोगी होत असल्याने त्याचे रत्न अधिक शुभ फल देईल.
सोबत दिलेल्या जन्म कुंडलीमध्ये गुरु अष्टमामध्ये मकर राशीचा आहे. मकर रास हि गुरु ग्रहाची नीच रास आहे. आधीच अष्टमात आणि त्यातही नीच राशीमध्ये, वरवर पाहता इथे गुरु निर्बली वाटतो. आता मकर राशीचा स्वामी शनि जन्म कुंडलीमध्ये मीन राशीमध्ये आहे. म्हणजेच गुरु व शनि एकमेकांच्या राशीमध्ये असुन परिवर्तन योगामध्ये आहेत. या योगाने अष्टमातील गुरु दशमात येतो.
हि एका स्त्री जातकाची जन्म कुंडली असुन तिची गुरुची महादशा चालु आहे. गुरु महादशेमध्ये चंद्र अंतर्दशा चालु असुन पुढील काळात मंगळ तसेच राहुची अंतर्दशा असणार आहे. जातकाचे शिक्षण चालु असुन या महादशेमध्येच करिअरची सुरुवात होणार आहे. या अर्थाने जातकाला गुरुचे रत्न पुष्कराज धारण करावयास सांगितले.
गुरु अष्टमात असल्याने वरवर पाहता त्याचे रत्न धारण करु नये असेच वाटेल. सुक्ष्म अभ्यास करता हाच ग्रह तिचे करिअर मार्गी लावेल.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/

राहु केतु दशा विचार

राहु केतु विषयी समाजात नेहमीच भीती राहिली आहे. हे पाप ग्रह असुन त्यांचा भ्रमणाचा मार्ग नागमोडी वळणाचा आहे. त्यामुळे त्यांच्यापासुन मिळणारी फले हि संमिश्र स्वरुपाचीच असतात. या ग्रहांच्या दशांविषयीही अनेक समज गैरसमज आहेत. या ग्रहांच्या दशा नेहमीच वाईट असतात असे नाही. त्यांच्या कुंडलीतील स्थितीवर त्यांच्या दशांचे फलित अवलंबुन असते.
सर्वप्रथम आपल्या कुंडलीमध्ये लग्नस्थानी कोणती रास आहे हे पहावे. बुध (मिथुन व कन्या), शुक्र (वृषभ व तुळ) व शनि (मकर व कुंभ) या ग्रहांच्या लग्नाला राहु केतुच्या दशा शुभ फलदायी जातात. गुरुचे (धनु व मीन) लग्न असता संमिश्र फलदायी जाई. चंद्र (कर्क), रवि (सिंह) व मंगळ (मेष व वृश्चिक) या ग्रहांच्या लग्नाला या दशा अशुभ फलदायी जातात.
एवढ्यावरच निर्णय घेता आला असता तर ते ज्योतिष शास्त्र कुठले? या नंतर आपल्याला तपासायचे आहे कि आपल्या जन्म कुंडलीमध्ये कोणत्या राशीमध्ये तसेच कोणत्या स्थानामध्ये राहु केतु स्थित आहेत.
हे ग्रह स्वक्षेत्री (राहु कन्येमध्ये तर केतु मीनेमध्ये) अथवा उच्च क्षेत्री (राहु मिथुनेमध्ये तर केतु धनुमध्ये) असता यांच्या दशा शुभ फलदायी जातात. आपल्या प्रश्नाचे जे कारक स्थान आहे, जन्म कुंडलीमध्ये त्या स्थानी जी रास आली असेल त्या राशीच्या स्वामीशी हे ग्रह काय योग करतात ते पहावे. वरील स्थिती असताना हे ग्रह शुभ योग करत असतील तर आपल्या प्रश्नासंदर्भात शुभ फले मिळतील. अशुभ योग करत असतील तर मात्र आपल्या प्रश्नासंदर्भात अशुभ फले मिळतील.
जन्मकुंडलीमध्ये जन्माच्या वेळी चंद्र राहुच्या/केतुच्या नक्षत्री (आर्द्रा, स्वाती, शततारका राहु तर अश्विनी, मघा, मुळ केतु) असता जन्मतः त्यांची महादशा असते. अथवा राहुची महादशा मंगळा नंतर तर केतुची महादशा बुधाच्या नंतर येते. हाच नियम अंतर्दशा व विदशांना लागु आहे. राहुची महादशा १८ वर्षे तर केतुची महादशा सात वर्षे असते.
अंतर्दशांचा विचार करता रवि, चंद्र व मंगळाच्या महादशेमध्ये राहु/केतुच्या अंतर्दशा अशुभ फलदायी जातात. बुध, गुरुच्या महादशेमध्ये संमिश्र तर शुक्र, शनि तसेच स्वतःच्या महदशेमध्ये शुभ फलदायी जातात. राहु/केतुच्या महादशेमधीलही रवि, चंद्राची अंतर्दशा अशुभ फलदायी, मंगळाची ठीक, तर बाकी सर्व ग्रहांच्या शुभ फलदायी जातात.
राहु केतुच्या दशा तरुण वयात येणे कधीही चांगले असे माझे मत आहे. कारण तेव्हा परिस्थितीशी दोन हात करायची माणसाची मानसिक तयारी असते. तसेच अपयशातुन खुप काही शिकायला तर मिळतेच मिळते पण पुन्हा उभे राहण्यासाठी कालावधीही असतो. मनुष्य राव असो कि रंक, त्याला प्रत्येक महादशा भोगावी लागते. अशावेळी आपल्या जन्म कुंडलीमध्ये कोणत्या ग्रहाची महादशा चालु आहे हे तपासुन कार्याचे नियोजन केल्यास आपण समाधानाने नक्कीच जगु शकतो.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/

घटस्फोटाची घाई कशाला?


सध्या आपले समाज जीवन मोठया प्रमाणात बिघडत चालले आहे. विशेषतः कुटुंब संस्थेवर याचा खुप मोठा परिणाम होत आहे. आपले कामकाजाचे जीवन अधिकाधिक गतिमान होत आहे, नवनविन तंत्रज्ञान दररोज आपल्या समोर येत आहे आणि यातुन आपली निर्णय क्षमताही गतिमान होत आहे. हि कामकाजाच्या ठिकाणी असलेली निर्णयांची गतिमानता आपल्या वैयक्तिक आयुष्यातही डोकावत आहे. आणि त्यातुन वेळ घेऊन घ्यावयाचे निर्णय, विचार करुन घ्यावयाचे निर्णय, चर्चा करुन घ्यावयाचे निर्णय आपण एखादा व्यावहारिक गुंता सोडवल्यासारखे चुटकीसरशी घेत आहोत. त्याचा भविष्यात स्वतःवर, समोरच्यावर, कुटुंबावर आणि समाजावर होणाऱ्या परिणामांचा जराही विचार न करता आपण हे निर्णय घेत आहोत. या निर्णयांपैकी सगळ्यात मोठा परिणाम करणारा निर्णय कुठला असेल तर तो पती पत्नींनी वेगळं होण्याचा - घटस्फोट घेण्याचा निर्णय.
सध्या घटस्फोटाचा कालावधी अवघ्या काही महिन्यांचा झाला आहे. आपण अशी अनेक उदाहरणे आजुबाजुला पाहिली असतील ज्यात विवाहानंतर अवघ्या काही दिवसांत मुलगी माहेरी परत येते. नंतर काही काळ अबोला वादविवाद आणि मग थेट घटस्फोटाचा निर्णय. त्यानंतर काही महिने काही वर्ष चालणारी घटस्फोटाची केस, दावे प्रतिदावे आणि शेवटी तडजोड करुन विभक्त होणे. यानंतर तो त्याच्या वाटेला ती तिच्या वाटेला. वय पुढे निघुन गेलेले असते. यामुळे दुसरा जोडीदार शोधताना अधिक अडथळे येतात. काहीवेळेस अपेक्षांना मुरड घालावी लागते. काहींच्या बाबतीत आधीचे बरे होते अशीही परिस्थिती येते. दुसऱ्या विवाहात तरी सुख मिळेल याची शाश्वती नाहीच. आपणच आपल्या आयुष्याशी पुन्हा एकदा जुगार खेळुन बघायचा एवढच. काहींचा तर दुसरा विवाह देखील होत नाही आणि मग उरलेले आयुष्य एकटेच जगण्याची परिस्थिती येते. आणि हो ... या सगळ्याचा परिणाम करिअरवर होतो तो वेगळाच. काहीजण तर करिअरमुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतात आणि मानसिक ताणतणावातून करिअरवरच परिणाम करुन बसतात.
अशा वेगवेगळ्या उदाहरणांशी एक ज्योतिषी म्हणुन माझा संपर्क येत असतो. जेव्हा या जातकांच्या कुंडल्या अभ्यासतो, त्यातली ग्रहस्थिती समोर येते, तेव्हा एकच प्रश्न मनामध्ये येतो - घटस्फोटाची घाई कशाला?
आपली जन्म कुंडली चंद्र, रवि, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु-केतु, हर्षल, नेपच्युन व प्लुटो या ग्रहांनी भरलेली असते. बारा भाव, बारा राशी व सत्तावीस नक्षत्रांतुन या ग्रहांच्या होणाऱ्या भ्रमणावर आपल्या प्रत्येकाचे आयुष्य ठरलेले आहे. या प्रत्येक ग्रहस्थितीतुन थोड्याफार फरकाने प्रत्येकाला जायचे आहे. फरक इतकाच आहे, कि प्रत्येकाच्या आयुष्यात या ग्रहयोगांचा येणारा कालावधी वेगवेगळा आहे. आणि हा कालावधी समजुन आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपला प्रवास समाधानी होतो. मग विवाहसुखाचा विचार करत असताना, विवाहसुखाचाही एक कालावधी आहे. ते कसे व किती मिळणार याचेही एक गणित आहे. आणि ते समजुन घेणे खुप गरजेचे आहे.
आपल्या जन्म कुंडलीमधील सप्तम स्थान हे विवाहाचे मुख्य कारक स्थान आहे. त्यामुळे सप्तमातील रास, त्या राशीचा स्वामी, राशिस्वामीची कुंडलीतील तसेच गोचर स्थिती, जन्म कुंडलीतील सप्तमातील ग्रह तसेच गोचरीने सप्तमातुन जाणारे ग्रह, सप्तमाला व सप्तमेशाला पाहणारे ग्रह हे आपल्या विवाहाविषयी बोलतात. शुक्र या ग्रहाकडे विवाहाचे मुख्य कारकत्व दिलेले आहे. त्या जोडीला स्त्री कुंडलीमध्ये चंद्र, रवि तर पुरुष कुंडलीमध्ये चंद्र, गुरु यांची स्थितीही महत्वाची ठरते. कुठलीही जन्म कुंडली अभ्यासताना लग्न व लग्नेशाला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे त्यांची कुंडलीतील स्थितीही वैवाहिक सुखाविषयी बोलत असते. सप्तमाचे सप्तम म्हणुनही लग्न स्थानाला महत्व आहे. जन्म कुंडलीतील द्वितीय स्थानावरुन कुटुंबाचा विचार केला जातो. अष्टम स्थान हे सप्तमाचे धन स्थान आहे. भाग्य स्थान हे धर्म त्रिकोणाचा भाग आहे. लाभ स्थान हे इच्छापुर्ती स्थान असुन ते मित्रांचेही स्थान आहे. त्यामुळे वैवाहिक सुखाचा विचार करताना या स्थानांचाही विचार करणे महत्वाचे ठरते. लग्न कुंडली इतकेच महत्व चंद्र कुंडली व नवमांश कुंडलीलाही आहे. त्यामुळे चंद्राचे सप्तम सप्तमेश अभ्यासणेही महत्वाचे ठरते.
हा झाला जन्म स्थित ग्रहांचा विचार. कुठलाही ग्रह त्याच्या महादशेत, अंतर्दशेत अथवा विदशेमध्ये फलित देत असतो. तसेच त्या ग्रहाचा ज्या ग्रहांशी योग होतो त्या ग्रहांच्या दशेमध्येही तो फलित देत असतो. अशावेळी कुंडलीमधील शुभ अथवा अशुभ योग हे त्या त्या ग्रहांच्या दशेत फलित देत असतात. जसा दशांचा विचार आहे, तसाच गोचर भ्रमणाचाही. ज्या स्थानाचा आपण विचार करत आहोत त्या स्थानाच्या स्वामीची गोचर स्थिती तसेच स्थानातुन गोचर भ्रमण करणाऱ्या ग्रहाच्या गोचर स्थितीवरही त्याचे फलित अवलंबुन असते. विवाहसुखाचा विचार करत असताना याचाच विचार करणे अधिक महत्वाचे ठरते.
विवाह झाल्यानंतर जेव्हा एक मुलगी एका नविन कुटुंबामध्ये प्रवेश करते तेव्हा तिला त्या कुटुंबाशी जुळवुन घ्यायला तसेच त्या कुटुंबाला तिच्याशी जुळवुन घ्यायला निश्चितच काही कालावधी जावा लागतो. हा कालावधी व्यक्ती सापेक्ष असु शकतो. परंतु या कालावधीमध्ये आपल्या अथवा कुटुंबियांच्या कुंडलीमध्ये काय ग्रहस्थिती चालु आहे, यावर आपले त्यांच्याशी जुळणे न जुळणे हे अवलंबुन असते. आपल्या कुंडलीमध्ये अगदी राजयोगी स्थिती असली तरी ज्यांच्याशी आपल्याला जुळवुन घ्यायचे आहे त्यांच्या कुंडलीमध्ये याला पूरक अशी शुभ ग्रहस्थिती असणे गरजेचे आहे. तेव्हाच जाउन एखादे नाते जुळते पक्के होते. स्पंदने जुळणे वगैरे काय ते म्हणतात ते हेच असावे. अशावेळी जर एकमेकांच्या कुंडलीमध्ये एकमेकांना पूरक अशी ग्रहस्थिती नसेल तर हि नाती जुळण्यामध्ये अडथळे येतात. यातुनच समज गैरसमज, मतभेद होणे, वादविवाद होणे हे सुरु होते. हे जर विवाहाच्या सुरवातीच्या कालावधीत घडले तर मग असे नातेपुढे जाण्यात अडथळे निर्माण होऊन त्याचे पर्यवसान विभक्त होण्या पर्यंत जाते.
इथे ज्योतिष शास्त्राची / ज्योतिषाची भुमिका महत्वाची ठरते. सप्तमात राहु केतु आहे, किंवा सप्तमेश अष्टमात आहे, किंवा सप्तमेश द्वितीयात आहे म्हणुन थेट घटस्फोटाचे भाकीत करणारे अनेक ज्योतिषी मी पहिले आहेत. सप्तमेश द्वितीयात जाता पुढचा मागचा काही विचार न करता द्विभार्या योग सांगणारे अनेक योगी आहेत. मंगळदोषाची तर कथाच वेगळी. परंतु असे सांगणे माझ्यामते चुकीचे आहे. कुठलीच ग्रहस्थिती कायम नसते हे सर्वांनीच लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आणि जसे आपण वर्षातुन चार महिने उन्हाळा सहन करतो, पावसाळा सहन करतो, थंडी सहन करतो, त्याच प्रमाणे कुंडलीतील शुभ अथवा अशुभ ग्रहस्थितीलाही सामोरे जाणे गरजेचे आहे. कारण उन्हाने तापलेल्या जमिनीला जसे पावसाचे थेंब गारव्याचा शिडकावा करतात तसेच अशुभ ग्रहस्थिती नंतर येणारी शुभ ग्रहस्थिती आपल्याला पुन्हा एकदा आनंदामध्ये चिंब भिजवते. फक्त त्यासाठी अशुभ ग्रहस्थितीच्या उन्हाळ्यामधुन जाणे गरजेचे राहते.
मुख्यत्वे करुन सप्तमेशाच्या गोचर भ्रमणाप्रमाणे आपल्या वैवाहिक आयुष्यात बदल होत राहतात. मग चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी आपली रास बदलत असतो. अशावेळी ज्यांच्या सप्तमात कर्क रास असेल त्यांना प्रत्येक दिवस वेगळा वाटेल. तर शनिला एक रास बदलायला अडीच वर्ष लागतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये सप्तमात मकर किंवा कुंभ रास आहे, त्यांना जी जी अडीच वर्षे शनि स्व अथवा उच्च अथवा मित्र राशीमध्ये असेल ती ती अडीच वर्ष शुभ ठरतील तर शत्रु अथवा नीच राशीमध्ये असता अशुभ ठरतील. हाच भाग ग्रह दशांचाही आहे. शुक्राची दशा सर्वाधिक म्हणजे तब्बल वीस वर्षांची असते. असा हा शुक्र कुंडलीमध्ये वैवाहिक सुखाच्या दृष्टीने शुभ असता हि वीस वर्ष परमानंदाची ठरतील तर अशुभ स्थितीत असता या उलट अनुभव येईल. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये कटुतेचे, वादविवादाचे, असमाधानाचे क्षण येतात तेव्हा तेव्हा समजुन चालावे कि आपली ग्रहस्थिती काहीशी बिघडली आहे. पण त्याच वेळी मनाला हे हि ठाम पणे सांगावे हि ग्रहस्थितीही बदलणार आहे. तेव्हा त्यासाठी वाट पहायलाच हवी.
घटस्फोटाकडे जाणारी अनेक प्रकरणे या पद्धतीचे मार्गदर्शन करुन आम्ही परतवली आहेत. व आज ते ते जातक आपापल्या आयुष्यात सुखीही आहेत. असेच नुकतेच समोर आलेले उदाहरण सोबत देत आहे. हि स्त्री जातकाची कुंडली असुन विवाहानंतर अवघ्या काही महिन्यातच सासरच्यांशी पटत नाही, विशेषतः नवऱ्याशी पटत नाही म्हणुन जातक घरी परत आली. त्यानंतर तीने व तिच्या घरच्यांनी घटस्फोट घ्यायचे निश्चित केले. त्यानंतर तशी केसही कोर्टात सुरु झाली. मात्र तारखांवर तारखा पडत होत्या पण हाती काहीच लागत नव्हते. अशावेळी हि जातक तिची कुंडली घेउन माझ्याकडे आली. मी कुंडली पाहता क्षणीच हि कुंडली घटस्फोटाची नसुन त्वरित केस मागे घ्यावी असे सांगितले. तीच्या कुंडलीमध्ये गुरु महादशेमध्ये शनिची दशा चालु होती. तर शनि गोचरीने लग्नी शत्रु राशीमध्ये होता. तीला नवऱ्याशी मोकळे पणाने चर्चा करुन सासरी परत जाण्यास सांगितले. जानेवारीत शनि बदलानंतर शनिचे जन्म शनि वरुन भ्रमण सुरु होईल. त्यानंतर वैवाहिक सुखातील अडथळे कमी होऊ लागतील. तर शनि नंतर येणारी बुधाची अंतर्दशा वैवाहिक जीवन मार्गी करेल असे सांगितले. जातकाच्या कुंडलीमध्ये बुध व शुक्र राशींमधून तर मंगळ व शुक्र नवमांशातुन परिवर्तन या राजयोगामध्ये आहेत. भाग्येश चंद्र सप्तमात उच्चीचा राजयोगी आहे हि कुंडलीमध्ये सर्वात जमेची बाजु आहे. तसेच लाभेश बुधाचे सप्तमात असणेही महत्वाचे आहे. गुरु षष्ठात मेषेचा अस्तंगत आहे, त्यामुळे त्याचा फारसा प्रभाव नाही. शनि कुटुंब स्थानातच वक्री आहे. सध्या हि जातक सासरी सुखात असुन तसा तीचा नुकताच फोनही आला होता. आणि खर तर म्हणुनच हा लेख लिहावयाचे प्रयोजन केले.
माझे सर्वच नवविवाहितांना हे सांगणे आहे कि आपल्या वैवाहिक सुखात जरी काही अडथळे आले तरी लगेच विभक्त होण्याचा घटस्फोट घेण्याचा निर्णय घाई घाईने घेऊ नये. कारण घटस्फोटाने जोडीदार बदलायची संधी मिळु शकते, ग्रहस्थिती बदलायची नाही. असा कोणताही निर्णय घेण्यापुर्वी तज्ञ ज्योतिषांकडे एकदा तरी आपली कुंडली दाखवावी व मगच पुढील वाटचाल करावी.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/